गावांच्या विकासासाठी सरकारचा मोठा निर्णय, दर ३ महीन्यांनी होणार सरपंच सभा
मुंबई: .गावच्या समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या सभांचं आयोजन केलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर स्पष्ट केलं.प्रसारमाध्यमाशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गार्हाणी, अडचणींची सोडवणूक करावी. ही सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
Edited by-सचिन कलमदाणे
Post a Comment