राज्यात पुन्हा कडक निर्बंधांची चर्चा, दोन आठवड्यात रूग्णसंख्या वेगाने वाढली
औरंगाबाद: राज्यात गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.दोन आठवड्यांत २० हजार २११ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही येत्या काळात कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.
राज्यात सध्या कुणीच मास्क वापरत नाही, असे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी उद्या भेटणार आहे. या बैठकीत करोनासंदर्भात कदाचित कठोर निर्णय घेतले जातील, असेही अजित पवारांनी नमूद केले. राजेश टोपे यांनी तर यावेळी थेट लॉकडाऊनचेच संकेत दिले. करोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, नाही तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले.
Post a Comment