प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण
विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन
राज्यात अहमदनगर जिल्हा अव्वल राहील
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास
अहमदनगर, दि. 26- जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने सर्वांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व ओळखून येथील स्थळांचे संरक्षण आणि संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. सन 2020-21 या नियोजन आराखड्यात विकासकामांसाठी 671 कोटी रूपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरावरुन अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वारही त्यांनी दिली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार काशिनाथ खराडे, राजेंद्र सुपेकर चालक सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलिस हवालदार शैलेश उपासनी, मन्सुर सय्यद, कैलास सोनार, पोलिस हवालदार अजित पवार यांचा तर पोलीस निरीक्षक ज्योती गाडेकर यांचा उत्कृष्ट अपराधसिध्दीकरिता रुपये 7 हजार व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (उत्तर विभाग) या विभागातील कर्मचारी ए.आर ठाणगे यांचा कर्तव्य बजावतांना कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे विमा कवच आणि कोविड योध्दा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, युवक, महिला आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल बागुल यांनी केले.
Post a Comment