अभिनेता कमल हसनचा मोदींना थेट सवाल, देश संकटात असताना नवीन संसद भवन कशाला?
नवी दिल्ली: देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल अभिनेते कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना केलाय. 2021 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला कमल हसन यांनी सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसद भवनाच्या मुद्द्यावरुन कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.
‘देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी एवढ्या मोठ्या रकमेच्या प्रकल्पाची गरज काय? कोरोनामुळे देशातील अर्धी जनता उपाशी आहे. लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, मग 1 हजार कोटींचं संसद भवन कशाला?’, असा सवाल कमल हसन यांनी विचारला आहे.
त्याचबरोबर ‘जेव्हा चीनची भिंत बांधली जात होती. तेव्हा हजारो लोकांचे प्राण गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी ही भिंत लोकांच्या सुरक्षेसाठी असल्याचं सांगितलं. मग कुणाच्या सुरक्षेसाठी आपण 1 हजार कोटी रुपये खर्च करुन नव्या संसदेची निर्मिती करत आहात? माननीय पंतप्रधानांनी याचं उत्तर द्यावं’, असं आव्हानच कमल हसन यांनी दिलं आहे.
Post a Comment